
मार्गशीष गुरुवार विशेष :-
श्री श्री श्री तुळजापूर निवासिनी जगदंबा भवानी:
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक तुळजापूरची जगदंबा भवानी, देवीच्या एकूण ५१ शक्तीपीठां पैकी एक आहे. शिवाय, त्या ५१ शक्तीपीठां मधल्या भारताच्या ८ प्रमुख पीठां मधील एक आहे.
कथा:
फार पूर्वी सत्ययुगात कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती ही पार्वती मातेची निस्सीम भक्त होती. कर्दम ऋषी तपश्चर्येला गेल्यावर अनुभूती पण तपाला बसली व आदी शक्ती पार्वतीची आराधना करू लागली. ते ठिकाण होते यामुनाचल म्हणजे हल्लीचे बालेघाट परिसर.
एकदा तिथून द्रविड देशाचा (दक्षिण भारत) कुक्कुर नावाचा राक्षस राजा चालला होता. त्याने अनुभूतीला पाहिल्यावर तिचे रूप पाहून तो तिला स्वतः बरोबर चालण्या विषयी सांगू लागला. तेव्हा, अनुभूतीने प्रतिकार करून आपण कर्दम ऋषीची पत्नी असून सध्या तपश्चर्या करीत असल्याचे म्हटले, तेव्हा राक्षस तिला बळजबरीने नेऊ लागला. अनुभूतीने देवी पार्वतीचा धावा सुरु करताच ती भवानी प्रकट झाली व कुक्कुर राक्षसाशी युध्द करून त्याला सैन्य सह ठार केले.
अनुभूतीच्या विनंतीवरून देवी भवानी बालेघाटाच्या परिसरात राहू लागली. ती त्वरेने म्हणजे वेळ न घालवता आपल्या भक्तिणी साठी धुवून आली, म्हणून ऋषीमुनी तिला "त्वरिता" म्हणू लागले. व त्या क्षेत्राला "त्वरीतापूर" त्याच त्वरीताचे पुढे, तुरीता, तुरजा असे अपभ्रंश होत "तुळजा" झाले. इथे ती जगदंबा पार्वती साक्षात पूर्ण रुपाने वसलेली आहे. ती चौदा भूवानांची स्वामिनी असल्यामुळे तिला "भवानी" असे म्हटले जाते.
पुढे, दक्षिणेत महिषासुर नावाचा दैत्य मातला. त्याने, इंद्रादी देवांचा पराभव केला, तेव्हा सर्व देवांनी श्री विष्णू व श्री शिवा च्या सल्ल्याने देवी भवानीची त्वरीतापूर येथे आवाहन केले. तेव्हा ती जगदंबा प्रकट होवून, महिषासुराचा लवकरच वध होईल असे म्हणली. ती सिंहावर आरूढ होवून बसली असता महिषासुराचा सेनापती चीकासुराची नजर तिच्यावर पडली व त्याने महिषासुराला तिचे सौंदर्याचे वर्णन सांगून राणी बनवण्यास योग्य आहे असे सांगितले. तेव्हा महिषासुराने तिला घेऊन ये असे फार्मावता, चीकासुरने तिच्या जवळ येऊन महिषासुराचा निरोप सांगितला.
तेव्हा देवीने "जो युद्धात मजाह पराभव करील, त्याच्याशी मी विवाह करीन" असे म्हटले. हे ऐकून महिषासुरने आपले सैन्य देऊन चीकासुराला पाठवले असता, देवीच्या अंगातून "अंबिका" देवी प्रकट झाली व तिने चीकासुराचा नाश केला. असे होता होता ९ दिवसात शुंभ निशुम्भ, रक्तबीज इत्यादी राक्षस नायक देवीच्या महाकाळी , कालरात्री, दुर्गा या अवतारांनी मारून टाकले. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा स्वतः १८ भुजांचे रूप धारण करून वध केला. तेव्हा पासून तुळजा भवानीला "महिषासुर मर्दिनी" असे म्हटले जाते. हीच देवी पुढे दमल्यामुळे सप्तश्रुंग म्हणजे सात शिखरे असलेल्या पर्वतावर विश्रांती साठी गेली. तेव्हा पासून तिला "सप्तशृंगी" म्हणू लागले.
पुढे देवीने मातंग नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून तुळजा भवानीला "मातंगी" म्हणू लागले. परशुराम अवतारच्या वेळी श्री विष्णूचे तेज कोणाला सहन होईना म्हणून शंकराने जमदग्नी ऋषीचे तर देवी भवानीने "रेणुका" रूप घेऊन जन्म घेतला व श्री विष्णूच्या परशुराम अवतारला जन्म दिला. तेव्हा पासून शिव शंकराला जगदपिता व देवी पार्वतीला जगद्माता म्हणू लागले.
अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी देवीची मूर्ती कदम पुजाऱ्यांनी लपवून ठेवली आणि दुसरी दुय्यम मूर्ती पुढे केली. ती दुय्यम मूर्ती अफझलखानाने खंडीत केली. तेव्हा देवीने "तुझा मृत्यू १५ दिवसात शिवाजी च्या हातून होईल" अशी गर्जना आसमंतात घुमली. पुढे जेव्हा शिवाजी महाराजांना कदम पुजाऱ्याचा पराक्रम कळला, तेव्हा ते खुश झाले. तेव्हा पासून कर्दम ऋषी आणि अनुभूती चे वंशज असलेल्या कदम पुजार्याना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सनद दिली.
देवीला राजेंनी राज्याभिषेका अगोदर अमूल्य दागिने, जड जवाहीर व दहा हजार होण खर्च लागू केला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक झाल्यावर सोन्या चांदीचे शिक्के मंदिराच्या गाभार्यात ठोकले व दर महा १०००० होण खर्च दिला.

